प्रशांत जैवाळ:-जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून प्रशासनाचा एक गुप्त मोर्चा सक्रिय असल्याची चर्चा होती. आज अखेर त्या कारवाईचा मोठा तपशील समोर आला आहे. शेतकऱ्यांना हक्काची जमीन परत मिळण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे. जिल्हा उपनिबंधक डॉ. महेंद्र चव्हाण यांच्या माहितीनुसार, अवैध सावकारांवर कठोर पाऊल उचलले गेले आहे. या कारवाईत आतापर्यंत 69 संवेदनशील प्रकरणांची उकल करत तब्बल 74.27 हेक्टर शेती जमीन मूळ शेतकऱ्यांच्या नावावर परत करण्यात आली आहे. हे आकडे धक्कादायक असून अवैध सावकारीचे जाळे किती खोलवर गेले होते याचा अंदाज यावरून येतो.
याच पार्श्वभूमीवर 55 प्रकरणांत गुन्हे दाखल होत आहेत. एकूण 651 प्रकरणांची चौकशी पूर्ण झाली असून उर्वरितांवर जलदगतीने काम सुरू आहे. शेतकऱ्यांवर ओढवलेल्या संकटाला आळा घालण्यासाठी ही मोहिम नियमितपणे सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
उपजीविकेचा आधार असलेली जमीन सावकारांच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी शेतकऱ्यांनी कोणत्याही भीतीशिवाय पुढे यावे, तक्रारी नोंदवाव्यात असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
📍तक्रारीसाठी संपर्क
जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, बुलडाणा
किंवा संबंधित तालुक्यातील सहाय्यक निबंधक कार्यालय






