नागरिकांच्या जीवितास धोका – चिंचपूर ग्रामस्थांची तक्रार

विलास गवारगुर (प्रतिनिधि) : खामगाव तालुक्यातील ग्राम चिंचपूर येथे महावितरण विभागाच्या डी.पी. (डिस्ट्रिब्युशन पॉईंट) ची अत्यंत धोकादायक अवस्था निर्माण झाली आहे. संबंधित डी.पी. झाडे व वेलींनी पूर्णपणे झाकली असून, डी.पी.चा मुख्य लाईट बॉक्स पूर्णपणे वेढला गेला आहे. झाडांच्या फांद्या थेट फ्युज व वायरींना स्पर्श करत असल्याने कोणत्याही क्षणी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या गंभीर बाबीकडे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी वायरमेन व संबंधित कर्मचाऱ्यांना वारंवार माहिती दिली, मात्र आजपर्यंत कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. सध्याच्या परिस्थितीत पावसाळ्यात झाडांमध्ये किंवा वेलींमध्ये करंट उतरण्याचा धोका असून नागरिकांना विजेचा धक्का बसण्याची शक्यता आहे, त्यामुळे नागरिकांच्या जीवितास थेट धोका निर्माण झाला आहे.
या डी.पी. परिसरातून नागरिक, शाळकरी मुले व शेतकरी नियमित ये-जा करीत असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी महावितरण विभागाने तातडीने लक्ष देऊन डी.पी.ची दुरुस्ती करावी, झाडे व वेली तोडाव्यात व सुरक्षितता उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी चिंचपूर येथील नागरिकांनी केली आहे.



