✍️ लेख : *“लोकशाहीचे लक्तरे वेशीवर टांगली जात आहेत*
लेखक – प्रशांत पाटील
आज महाराष्ट्राच्या राजकारणात जे काही घडत आहे, ते पाहून प्रत्येक जागरूक नागरिकाच्या अंतःकरणात संतापाची ज्वाला धगधगते आहे. एका बाजूला असीम सरोदे यांसारख्या लोकशाहीत निष्ठा असलेल्या वकिलाची सनद रद्द करण्याचा प्रकार घडतो आणि दुसरीकडे जे महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून संविधानिक पदावर असतांना तेच छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुले यांच्या विचारांचा, वारशाचा आणि संस्कृतीचा अपमान करण्याचे धाडस दाखवतात हे सर्व पाहून प्रश्न पडतो, ही कोणती लोकशाही आहे?
जेव्हा संविधानाने दिलेल्या अधिकारांवर गदा येते जेव्हा मतभिन्नतेला देशद्रोहाचे लेबल लावले जाते आणि जेव्हा न्यायालयांवर, माध्यमांवर आणि विचारवंतांवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न होतो तेव्हा हे लोकशाहीचे नव्हे तर हुकूमशाहीचे पाऊल असते. असीम सरोदे यांनी फक्त लोकहितासाठी आवाज उठवला, जनतेच्या बाजूने उभे राहिले, आणि त्याची शिक्षा म्हणजे “सनद रद्द”? हा अन्याय नव्हे तर भयभीत करणारा संदेश आहे “विरोध केलात तर तुमचं अस्तित्व मिटवू.”
आणि दुसरीकडे राज्यपाल नावाच्या व्यक्तीने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आणि महात्मा फुलेंबद्दल केलेले विधान हे फक्त व्यक्तीवरचा हल्ला नाही ते महाराष्ट्राच्या अस्मितेवर, संस्कृतीवर आणि विचारधारेवर केलेले विषारी प्रहार आहेत. अशा लोकांना “राज्यपाल” म्हणून ठेवणे हेच लोकशाहीवरील सर्वात मोठे कलंक आहे.
ही लढाई केवळ असीम सरोदे यांची नाही ही प्रत्येक विचारशील, जाणीवसंपन्न महाराष्ट्राच्या नागरिकाची आहे. कारण आज जर आपण गप्प राहिलो, तर उद्या प्रत्येकाचे तोंड बंद केले जाईल. आज जर आपण उभे राहिलो नाही, तर इतिहास आपल्याला माफ करणार नाही.
छत्रपतींच्या महाराष्ट्रात आवाज दडपला जाईल, विचार जाळले जातील आणि न्याय मागणाऱ्यांना शिक्षा होईल हे आपण कदापि सहन करणार नाही.
आम्ही ठाम आहोत
“विचार दाबले तरी, ते पुन्हा उभे राहतात…
लोकशाहीचे लक्तरे टांगता येतील, पण तिचा आत्मा कधीच संपवता येणार नाही!”
✊ – प्रशांत पी.पाटील
चिखली – बुलढाणा
7507759777






