शिवाजी शिराळे पाटील यांचा आक्रमक पवित्रा – ३ नोव्हेंबरपासून आमरण उपोषणाची घोषणा!
चिखली (लोक महाराष्ट्र न्यूज) प्रशांत जैवाळ :-
दलित वस्तीतील बुद्धविहाराकडे जाणाऱ्या मंजूर रस्त्याचे काम दीर्घकाळ प्रलंबित राहिल्याने स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांचा संयम अखेर सुटला आहे. नगरपरिषद प्रशासनाच्या दुर्लक्ष आणि उदासीनतेविरुद्ध शिवसेनेचे युवासेना विधानसभा संपर्क प्रमुख शिवाजी शिराळे पाटील यांनी ३ नोव्हेंबरपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
नगरपरिषदेच्या ज्युनिअर इंजिनिअर यांनी सादर केलेल्या लेखी अहवालात रस्त्याच्या कामासाठी आवश्यक सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्याचे स्पष्ट नमूद आहे. तरीदेखील प्रत्यक्ष काम सुरू झालेले नाही, यामुळे प्रशासनाविषयी तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
या संदर्भात बोलताना शिवाजी शिराळे पाटील म्हणाले —
> “दलित वस्तीकडे जाणाऱ्या नागरिकांना दररोज चिखल, खड्डे आणि असुविधांचा सामना करावा लागतो. मंजूर काम असूनही ते लांबणीवर टाकणे म्हणजे जनतेचा अपमान आहे. आता शब्द नव्हे, कृती हवी!”
शिराळे पाटील यांच्या या उपोषणात विजय खरात, अर्जुन बोर्डे, सचिन मोरे आणि रविंद्र काकडे हे सामाजिक कार्यकर्तेही सहभागी होणार आहेत. हे उपोषण ३ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर सुरू होणार असून, रस्त्याचे काम प्रत्यक्ष सुरू होईपर्यंत चालू राहील.
दरम्यान, प्रभाग क्र. १० मधील नागरिकांमध्ये या प्रश्नावर संतापाची लाट उसळली असून, नगरपरिषद प्रशासनावरील विश्वास डळमळीत झाल्याचे चित्र दिसत आहे.
सदर रस्ता ‘सुखकर्ता लॉन्स’ आणि डॉ. शिवशंकर खेडेकर यांच्या हॉस्पिटलच्या मधून दलित वस्तीकडे (बुद्धविहाराकडे) जातो. या रस्त्यावर खोल खड्डे, चिखल आणि धुळीमुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागतो. अनेक वेळा मागणी करूनही प्रत्यक्ष काम न झाल्याने अखेर नागरिकांनी संघर्षाचा मार्ग स्वीकारला आहे.
३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या आमरण उपोषणावेळी नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणावर नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि शिवसैनिकांची उपस्थिती अपेक्षित आहे.






