गजानन माळकर पाटील तालुका प्रतिनिधी मंठा
तांड्यातून रॅली; गाव, फाटा आणि नायगाव टोल नाका ते जयपूर रोडवरील अवैध दारूविक्री बंद करण्याची मागणी….
मंठा तालुक्यातील वझर सरकटे, अंभोडा कदम, हेलस, माहोरा आणि माळेगावनंतर आता केहाळ वडगाव येथील महिलांनीही अवैध दारूविक्रीविरोधात एल्गार पुकारला आहे. जयरामनगर तांड्यावरील महिलांनी शनिवारी सकाळी ११ वाजता तांड्यात रॅली काढून अवैध दारूविक्री तातडीने बंद करण्याची जोरदार मागणी केली.
“दारूमुळे आमचे संसार उद्ध्वस्त होत आहेत, घरातील शांतता हरवली आहे आणि मुलांवरील संस्कार बिघडत आहेत. आता तरी दारू बंद करा आणि आमचे संसार वाचवा,” अशी आर्त हाक महिलांनी पोलीस प्रशासनाला दिली.
महिलांच्या म्हणण्यानुसार, गावात, तांड्यात, फाट्यावर तसेच नायगाव टोल नाका ते जयपूर रोड परिसरात अवैध दारूविक्री सुरू आहे. सहज उपलब्ध होणाऱ्या दारूमुळे अनेक कुटुंबांना आर्थिक आणि सामाजिक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याची व्यथा महिलांनी मांडली.
हातात पिऊन आल्यावर ज्या आवजाराणे मारहाण होते ते आवजार घेऊन महिलांनी तांड्यात रॅली काढत अवैध दारूविक्रीविरोधात आवाज बुलंद केला. या आंदोलनाचा व्हिडीओही समोर आला असून त्यामध्ये महिलांनी आपल्या व्यथा मांडत पोलीस प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे.
वझर सरकटे, अंभोडा कदम, हेलस, माहोरा आणि माळेगावनंतर आता केहाळ वडगावातील महिलाही रस्त्यावर उतरल्याने मंठा तालुक्यातील अवैध दारूविक्रीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गावोगावी महिलांना आंदोलन करण्याची वेळ येत असेल, तर अवैध दारूविक्रीचे जाळे नेमके किती खोलवर पसरले आहे, असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.
महिलांच्या आक्रोशानंतर तरी पोलीस आणि संबंधित प्रशासन अवैध दारूविक्रेत्यांविरुद्ध ठोस कारवाई करणार की महिलांचा आवाज पुन्हा आश्वासनांच्या गर्दीत हरवणार, याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे






