छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
भव्य बग्गी मिरवणूक, प्रतिमापूजन आणि मान्यवरांच्या उपस्थितीत अहिल्यादेवींच्या लोककल्याणकारी कार्याचा गौरव
सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथे लोककल्याणकारी, न्यायप्रिय आणि आदर्श राज्यकर्त्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती मोठ्या उत्साहात, भक्तिमय आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. ग्रामस्थ, युवक आणि महिला भगिनींच्या उत्स्फूर्त सहभागामुळे जयंती उत्सवाला विशेष रंगत आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी आकर्षक सजविण्यात आलेल्या बग्गीतून राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या न्यायनिष्ठ, लोकाभिमुख आणि दूरदृष्टीच्या प्रशासनाचा गौरवपूर्ण आढावा घेतला.
यावेळी वक्त्यांनी सांगितले की, अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या राज्यकारभारात प्रजेच्या कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य दिले. देशभरातील मंदिरे, घाट, धर्मशाळा, विहिरी तसेच विविध सार्वजनिक बांधकामांच्या माध्यमातून त्यांनी भारतीय संस्कृतीच्या जतन व संवर्धनासाठी उल्लेखनीय योगदान दिले. काशी विश्वनाथ मंदिराच्या जीर्णोद्धारासह अनेक तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी त्यांनी केलेले कार्य आजही प्रेरणादायी मानले जाते.
यावर्षीच्या जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष म्हणून मनोज शिवाजीराव बुढाळ (भाजपा तालुका सरचिटणीस) यांनी नेतृत्व केले. उपाध्यक्ष अंबादास गणपत सूर्यवंशी, सचिव संदीप कोलते तसेच समिती सदस्य प्रकाश सूर्यभान शिपलकर, किसन महादू सूर्यवंशी, शालिग्राम उत्तम काळे आणि गणेश दगडू नरोटे यांनी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले

कार्यक्रमास भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष इद्रिसभाऊ मुलतानी, पंचायत समिती सोयगावचे सभापती उत्तमभाऊ चव्हाण तसेच पंचायत समिती सदस्य राहुलदादा राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून जयंती उत्सवात सहभाग नोंदविला.
ग्रामस्थ, युवक आणि जयंती उत्सव समितीच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या पार पडला. उपस्थित मान्यवरांनी आयोजन समितीचे अभिनंदन करत अशा सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रेरणादायी उपक्रमांना पुढील काळातही चालना देण्याचे आवाहन माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव बुढाळ यांनी केले.






