जामनेर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
“झाडे लावा, झाडे जगवा” अभियान अपुरे; ४५ अंशांपार तापमानामुळे उष्माघाताचा धोका वाढला
जामनेर; जळगाव गेल्या दहा-बारा वर्षांपासून शासन व विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून “झाडे लावा, झाडे जगवा” हे अभियान मोठ्या उत्साहात राबविण्यात आले. मात्र प्रत्यक्षात झाडे लावण्यापेक्षा ती जगविण्याकडे पुरेसे लक्ष दिले गेले नसल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. परिणामी, लावलेली अनेक झाडे टिकली नाहीत, तर दुसरीकडे ७० ते १०० वर्षे वय असलेल्या मोठ्या वृक्षांची मोठ्या प्रमाणावर कत्तल करण्यात आल्याचे वास्तव समोर आले आहे.
विशेषतः सिमेंट काँक्रिट रस्त्यांच्या कामासाठी अनेक ठिकाणी जुन्या वृक्षांची तोड करण्यात आली. काही भागात ही कामे अद्याप अपूर्ण अवस्थेत असून, झाडेही नष्ट झाली आणि रस्तेही पूर्णत्वास गेले नाहीत, अशी स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत असून स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, राज्यातील अनेक भागांमध्ये उष्णतेची लाट तीव्र होत चालली आहे. तापमानाचा पारा ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. वाढत्या उन्हामुळे उष्माघाताचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला असून, काही ठिकाणी उष्माघातामुळे मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनाही समोर येत असल्याचे हि डि एन चौधरी विशाल लान्स अँन्ड रिसाॅर्ट जामनेर यांनी म्हटले आहे.
या पार्श्वभूमीवर जामनेर येथील डि. एन. चौधरी यांनी शेतकरी, कामगार व सर्वसामान्य नागरिकांना आवाहन केले आहे की, वाढत्या उष्णतेच्या काळात स्वतःच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. दुपारच्या कडाक्याच्या उन्हात शक्यतो बाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी पिणे, डोक्यावर संरक्षण ठेवणे यासारख्या उपाययोजना कराव्यात, असे त्यांनी सांगितले.
पर्यावरण संतुलन राखण्यासाठी वृक्षसंवर्धन अत्यंत गरजेचे असून, केवळ झाडे लावणे नव्हे तर ती जगविण्यावर भर देणे आवश्यक आहे. अन्यथा भविष्यात तापमानवाढ व पर्यावरणीय संकट अधिक गंभीर होण्याची भीती डि एन चौधरी यांच्या कडून करण्यात आली आहे.






