छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
शेतरस्त्यांच्या हक्कासाठी कायदेशीर लढा उभारण्याचे आवाहन; तज्ञांचे सविस्तर मार्गदर्शन
शेतकऱ्यांच्या शेतरस्ते, शिवरस्ते व पाणंद रस्ते या अत्यंत महत्त्वाच्या व हक्काच्या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आता न्यायालयीन मार्गाचा अवलंब करण्याची गरज अधोरेखित होत असून, याच पार्श्वभूमीवर रविवार दि. १२ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजता प्रशासकीय विश्रामगृह, छत्रपती संभाजीनगर येथे ‘शिव पाणंद शेतरस्ता चळवळी’च्या वतीने विशेष मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्यातील अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या शेतरस्त्यांसाठी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही न्याय मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. परिणामी, शेती कामकाजावर मोठा परिणाम होत असून शेतकऱ्यांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. अशा परिस्थितीत न्यायालयीन लढा हा अधिक प्रभावी, ठोस आणि कायमस्वरूपी उपाय ठरू शकतो, असा विश्वास या चळवळीच्या माध्यमातून व्यक्त करण्यात येत आहे.
या मार्गदर्शन मेळाव्यात प्रख्यात विधिज्ञ ॲडव्होकेट प्रतीक्षा काळे यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे. त्या शेतरस्त्यांशी संबंधित कायदेशीर हक्क, विविध तरतुदी, न्यायालयात केस दाखल करण्याची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रांची तयारी तसेच प्रभावी कायदेशीर उपाययोजना याबाबत सखोल माहिती देणार आहेत. उच्च न्यायालयात त्यांनी मिळवलेले यश आणि अनुभव हा शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
तसेच ‘शिव पाणंद शेतरस्ता चळवळी’चे प्रणेते शरद पवळे हे उपस्थित शेतकऱ्यांना संबोधित करणार असून, संघटितपणे आणि कायदेशीर मार्गाने लढा उभारण्याचे आवाहन करणार आहेत. प्रत्येक शेतकऱ्याला दर्जेदार व हक्काचा शेतरस्ता मिळवून देण्यासाठी ही चळवळ कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
या मेळाव्याला राज्यभरातील शेतकरी बांधवांनी आपल्या शेतजमिनीशी संबंधित सर्व आवश्यक कागदपत्रांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनही शरद पवळे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना केले आहे. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी निर्णायक पाऊल ठरणाऱ्या या मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






