धाड/बुलढाणा (प्रतिनिधी)
बुलढाणा तालुक्यातील धाड येथे अन्नातून विषबाधा झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून एका कुटुंबातील तीन चिमुकल्या भावंडांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
या घटनेत मोहंमद अली मोहंमद वसीम जमदार (वय ४), मशीरा मोहंमद वसीम जमदार (वय ७) आणि फातिमा मोहंमद वसीम जमदार (वय ८) या तिघांचा मृत्यू झाला आहे. तर आई अफरीन मोहंमद वसीम जमदार (वय ३४) व अश्मिरा (वय ३) यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्रीपासून कुटुंबातील सदस्यांना पोटदुखी, मळमळ व उलट्यांचा त्रास सुरू झाला होता. सोमवारी सकाळी प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तीनही चिमुकल्यांचा मृत्यू झाला.
या घटनेमुळे धाड व पंचक्रोशीत शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. प्राथमिक तपासात अन्नातून विषबाधा झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून, अन्नाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्याची प्रक्रिया सुरू आहे.






