छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
दशपर्णी, जीवामृत, बीजामृत तयार करण्याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण; खर्च बचतीसाठी मोठी संधी; सुभाष आघाव
कन्नड, सिल्लोड व सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी नैसर्गिक शेतीला चालना देणारी महत्त्वपूर्ण पुढाकार म्हणून दिनांक ८ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ७.३० वाजता विशेष डिजिटल शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही शेतीशाळा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आणि पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली असून, शेतकऱ्यांना नैसर्गिक कृषी निविष्ठांचे सखोल मार्गदर्शन या माध्यमातून दिले जाणार आहे.
या डिजिटल शेतीशाळेमध्ये शेतकऱ्यांना घरच्या घरी तसेच गावपातळीवर नैसर्गिक कृषी निविष्ठा कशा तयार कराव्यात याचे सविस्तर प्रशिक्षण दिले जाणार आहे. सिल्लोड उपविभागीय कृषी अधिकारी सुभाष आघाव यांनी बोलताना सांगितले.विशेषतः दशपर्णी अर्क, लिंबोळी अर्क, बीजामृत, जीवामृत आणि घन जीवामृत यांसारख्या महत्त्वाच्या घटकांची निर्मिती कशी करावी याचे प्रत्यक्ष मार्गदर्शन तज्ज्ञांकडून करण्यात येणार आहे.
सध्याच्या काळात वाढत्या रासायनिक खतांच्या आणि कीडनाशकांच्या खर्चामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडत आहेत. या पार्श्वभूमीवर नैसर्गिक कृषी निविष्ठांचा वापर केल्यास शेतीचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो, तसेच उत्पादनाची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते. यामुळे शेतकऱ्यांना अधिक टिकाऊ आणि पर्यावरणपूरक शेतीकडे वळण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
नैसर्गिक शेती पद्धतीत या निविष्ठांचे महत्त्व अनन्यसाधारण असून, जमिनीची सुपीकता वाढवणे, पिकांची रोगप्रतिकारक क्षमता वाढवणे आणि दीर्घकालीन उत्पादनक्षमतेत वाढ करणे यासाठी या उपाययोजना अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत.
तरी कन्नड, सिल्लोड व सोयगाव तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी या डिजिटल शेतीशाळेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सुभाष आघाव उपविभागीय कृषी अधिकारी, सिल्लोड यांनी केले आहे






