चिखली : उमा जैवाळ
चिखली शहरातील मध्यवर्ती असलेल्या जयस्तंभ चौक परिसरात अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत जवळपास पाच ते सहा लहान-मोठी दुकाने जळून खाक झाली असून व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जयस्तंभ चौकातील दाबेली, वडापाव, भेळ, फळांचे तसेच घड्याळाचे दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. आग लागल्यानंतर परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आगीमुळे दुकानांमधील साहित्य, फर्निचर तसेच इतर वस्तू पूर्णपणे जळून खाक झाल्याने व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परतेने पाण्याच्या फवाऱ्यांचा मारा करत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. स्थानिक नागरिकांनीही आग विझविण्यासाठी मदत केली.
सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. मात्र आगीमुळे काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.






