मानोरा (प्रतिनिधी – सुधीर ढगे)

आज 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मानोरा शहरात भव्य आणि उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ठीक ११ वाजता शिवाजी चौक, मानोरा येथे महाराजांच्या पुतळ्याचा जलाभिषेक करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. जलाभिषेकानंतर विविध सांस्कृतिक व प्रेरणादायी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाविषयी माहिती देताना प्राध्यापक ओम बोलते यांनी शिवजयंतीचे ऐतिहासिक महत्त्व तसेच महाराजांच्या कार्याचा समाजावर झालेला प्रभाव याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी तरुण पिढीने शिवचरित्रातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. त्यानंतर जिल्हा संघटक यांनी उपस्थितांना संबोधित करताना महाराजांचे कार्य, त्यांचे शौर्य, दूरदृष्टी आणि रयतेसाठी केलेले पराक्रम याबद्दल माहिती दिली. “रयतेचा राजा” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा जपणे ही आपली जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सर्व नागरिकांना भगव्या ध्वजाचा सन्मान राखण्याचे आवाहन करण्यात आले. आपला भगवा ध्वज गाडीवर किंवा घरावर व्यवस्थित बांधावा, त्याची कोणतीही विटंबना होणार नाही याची काळजी घ्यावी, असे स्पष्ट आवाहन जिल्हा संघटक यांनी केले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिक, युवक-युवती तसेच शिवभक्त उपस्थित होते. संपूर्ण वातावरण “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी भारावून गेले होते.






