विशेष प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर मार्गावर विशेष सुरक्षा, कमांडो, सीसीटीव्ही व ड्रोनद्वारे सतत देखरेख; दत्तात्रय गोसावी यांच्याकडून पोलीस अधिकाऱ्यांचा सन्मान

सिन्नर, दि. ९ जुलै महाराष्ट्राच्या वैष्णव परंपरेतील श्रद्धा, भक्ती आणि समतेचे प्रतीक असलेल्या श्री संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पायी दिंडी पालखी सोहळ्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून हजारो वारकरी “ज्ञानोबा-तुकाराम” आणि “विठ्ठल-विठ्ठल”च्या अखंड नामगजरात श्री क्षेत्र पंढरपूरकडे मार्गस्थ झाले आहेत. लाखो भाविकांच्या उपस्थितीत पार पडणाऱ्या या ऐतिहासिक पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाकडून संपूर्ण मार्गावर अत्यंत चोख आणि नियोजनबद्ध सुरक्षा व्यवस्था उभारण्यात आली आहे.
श्री संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचा रथ सुमारे १०० किलो चांदीचा असल्यामुळे तसेच मोठ्या संख्येने वारकरी सहभागी होत असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये, चोरी, गर्दीतील गैरप्रकार अथवा सुरक्षेला बाधा निर्माण होऊ नये यासाठी संस्थान व वारकरी प्रतिनिधींच्या मागणीनुसार विशेष पोलीस सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. यामध्ये कमांडो पथकासह प्रशिक्षित पोलीस अधिकारी व कर्मचारी सातत्याने पालखीसोबत कार्यरत आहेत.
श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून नाशिक, सिन्नर, वावी आदी मार्गाने पुढे पंढरपूरकडे जाणाऱ्या पालखी मार्गावरील प्रत्येक जिल्ह्यात त्या-त्या जिल्ह्यातील ग्रामीण पोलीस दल, स्थानिक पोलीस ठाणे, वाहतूक शाखा तसेच विशेष सुरक्षा पथके यांच्यामार्फत प्रभावी बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गर्दीच्या संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून ड्रोनच्या माध्यमातून संपूर्ण पालखी सोहळ्यावर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. त्यामुळे वारकऱ्यांना सुरक्षित आणि शिस्तबद्ध वातावरणात वारी पूर्ण करता येत आहे.
दरम्यान, पालखी मार्गावर विविध गावांमध्ये वारकऱ्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात येत असून हरिनामाचा गजर, टाळ-मृदुंगाचा निनाद, भजन-कीर्तन आणि विठ्ठल नामस्मरणाने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला आहे.
या पवित्र सोहळ्याच्या निमित्ताने वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी श्री दत्तात्रय गोसावी यांनी पालखी सोहळ्याच्या सुरक्षेसाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करत त्यांचा वारकरी परंपरेनुसार सत्कार केला. वारकऱ्यांचे प्रतीक असलेले उपरणे, वारकरी टोपी आणि श्री पांडुरंगाची प्रतिमा भेट देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी पोलीस निरीक्षक श्री सुनील बडगुजर (एमआयडीसी पोलीस स्टेशन, सिन्नर), पोलीस उपनिरीक्षक श्री रामनाथ तांदळकर (सिन्नर पोलीस स्टेशन) तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री आशिष शेळके (वावी पोलीस स्टेशन, नाशिक ग्रामीण) यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी उपस्थितांनी पालखी सोहळ्याच्या यशस्वी, सुरक्षित आणि सुरळीत आयोजनासाठी पोलिस प्रशासनाच्या कार्याचे कौतुक केले. श्रद्धा, सेवा आणि सुरक्षा यांचा सुंदर संगम या पालखी सोहळ्यात अनुभवायला मिळत असून वारकरी आणि पोलिस प्रशासन यांच्यातील समन्वयामुळे आषाढी वारीची परंपरा अधिक सुरक्षित आणि प्रेरणादायी ठरत असल्याची भावना दत्तात्रय रामचंद्र गोसावी यांच्या कडून व्यक्त करण्यात आली.






