सिल्लोड | प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
राज्यमंत्री दर्जासह अभ्यास समिती अध्यक्षपदाची नियुक्ती; हजारो नागरिकांच्या उपस्थितीत जल्लोष

सिल्लोड;महाराष्ट्र शासनाच्या मुस्लिम समाज अभ्यास समितीच्या अध्यक्षपदी (राज्यमंत्री दर्जा) नियुक्ती झाल्याबद्दल मा. इद्रिसभाऊ मुलतानी यांचा तसेच भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष मा. सुहासजी सिरसाठ यांची विधान परिषद सदस्यपदी निवड झाल्याबद्दल सिल्लोड–सोयगाव विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला भव्य नागरी सत्कार समारंभ उत्साहपूर्ण आणि दिमाखदार वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमाला नागरिक, कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
लोकनेते तथा माजी केंद्रीय मंत्री मा. रावसाहेब पाटील दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या भव्य सोहळ्यात भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, विविध स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी, विविध आघाड्यांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि हजारो नागरिक उपस्थित होते. संपूर्ण परिसर घोषणांनी, टाळ्यांच्या कडकडाटाने आणि जल्लोषपूर्ण वातावरणाने दुमदुमून गेला.
यावेळी मान्यवरांनी मा. इद्रिसभाऊ मुलतानी यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि समाजहिताच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या नियुक्तीमुळे मुस्लिम समाजाच्या विविध प्रश्नांना शासन स्तरावर प्रभावीपणे न्याय मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच भाजपा जिल्हाध्यक्ष सुहासजी सिरसाठ यांच्या विधान परिषद सदस्यपदी झालेल्या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन करत त्यांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासाला अधिक गती मिळेल, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.
सत्काराला उत्तर देताना मा. इद्रिसभाऊ मुलतानी म्हणाले की, “हा सन्मान माझा नसून सिल्लोड–सोयगाव मतदारसंघातील जनतेचा, कार्यकर्त्यांचा आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा आहे. महाराष्ट्र शासनाने माझ्यावर सोपविलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत मुस्लिम समाजासह सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी शासन स्तरावर सातत्याने प्रयत्न करणार आहे. जनतेचे प्रेम, विश्वास आणि आशीर्वाद हीच माझ्या कार्याची खरी प्रेरणा आणि ताकद आहे.”
त्यांनी पुढे सर्व नागरिक, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि उपस्थित मान्यवरांचे मनःपूर्वक आभार मानत हा सन्मान अधिक जबाबदारीची जाणीव करून देणारा असल्याचे सांगितले. समाजहित, सर्वसमावेशक विकास आणि जनसेवा हीच आपल्या सार्वजनिक जीवनाची दिशा राहील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी शुभेच्छापर भाषणे करत मा. इद्रिसभाऊ मुलतानी व मा. सुहासजी सिरसाठ यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. संपूर्ण कार्यक्रम उत्साह, शिस्त आणि जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडला असून, सिल्लोड–सोयगाव विधानसभा मतदारसंघातील जनतेने दिलेला अभूतपूर्व प्रतिसाद हा या सोहळ्याचे प्रमुख वैशिष्ट्य ठरला.






