जळगाव जामोद येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) अल्पसंख्याक विभागाची जिल्हा आढावा संवाद बैठक उत्साहात..
जळगाव जामोद, प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) अल्पसंख्याक विभागाची बुलढाणा जिल्हा आढावा व संवाद बैठक जळगाव जामोद येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात उत्साहात संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष प्रसन्नजीत (दादा) पाटील होते.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बुलढाणा जिल्ह्याचे प्रभारी वाजीद असलम साहेब उपस्थित होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. रिझवान खान, ॲड. रफिक खान , छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष अब्दुल रझाक पठाण, जिल्हा कार्याध्यक्ष सय्यद लाईकुद्दीन भाई, बुलढाणा जिल्हा महिला अध्यक्षा वर्षाताई वाघ यांची उपस्थिती लाभली.
या बैठकीचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष ॲड. करीम खान यांनी केले होते. त्यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या संवाद बैठकीस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीला संबोधित करताना प्रा. डॉ. रिझवान खान म्हणाले की, देशाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व जाती-धर्मातील नागरिकांनी एकत्र येऊन कार्य करणे आवश्यक आहे. समाजात तेढ निर्माण करणाऱ्या प्रवृत्तींना लोकशाही मार्गाने पराभूत करून सामाजिक सलोखा आणि बंधुभाव टिकवणे ही काळाची गरज आहे.
ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती-धर्मातील लोकांना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली आणि न्याय, समानता व सर्वसमावेशकतेची भूमिका जपली. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता सामाजिक ऐक्य आणि शांततेच्या मूल्यांशी कायम बांधिल राहील.
यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते खा.शरद पवार यांच्या कार्याचा उल्लेख करताना सांगितले की, त्यांनी आपल्या दीर्घ राजकीय कारकिर्दीत सर्व समाजघटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून अल्पसंख्याक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे तसेच उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत व कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यास महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
देशात जेव्हा-जेव्हा अल्पसंख्याक समाजासमोर विविध आव्हाने निर्माण झाली, तेव्हा शरद पवार यांनी समाजाच्या हिताचे रक्षण करण्याची भूमिका घेतली असल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विचारांशी अधिकाधिक नागरिकांना जोडून पक्ष संघटना मजबूत करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
कार्यक्रमाच्या शेवटी पक्ष संघटन बांधणी, आगामी राजकीय धोरणे आणि अल्पसंख्याक समाजाच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणात पक्षाला बळकटी मिळण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन पक्षाला ऊर्जा देण्याचे काम करू अशी गवाही दिली.. या वेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी पक्ष बळकटीसाठी अधिक जोमाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.






