छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
दिल्लीपर्यंत पाठपुरावा करत सिल्लोड,सोयगाव तालुक्याच्या विकासाला गती; नागरिकांत आशावाद
सोयगाव :
नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत सोयगाव तालुक्यातील फर्दापूर जिल्हा परिषद गटातून माहीन इद्रिस मुलतानी यांनी भरघोस मतांनी विजय मिळवत विकासाच्या राजकारणावर जनतेने शिक्कामोर्तब केले. या विजयामुळे संपूर्ण तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून तळागाळातील नेतृत्वावर जनतेने पुन्हा विश्वास व्यक्त केला आहे.
या ऐतिहासिक विजयाबद्दल भारतीय जनता पक्षाचे अल्पसंख्यांक प्रदेश अध्यक्ष इद्रिसजी मुलतानी यांनी फर्दापूर गटातील सर्व गावकरी, कार्यकर्ते, महिला, युवक व ज्येष्ठ नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानले. जनतेच्या विश्वासामुळेच हा विजय शक्य झाल्याचे त्यांनी नमूद केले.
सोयगाव तालुक्याच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणारे आणि जनतेच्या समस्या स्वतःच्या समजून सोडवणारे नेतृत्व म्हणून इद्रिस मुलतानी यांची ओळख निर्माण झाली आहे. निवडणूक संपल्यानंतरही त्यांनी विकासकामांना गती देण्यासाठी थेट दिल्ली दरबारी पाठपुरावा सुरू ठेवला आहे.
अलीकडेच केंद्रीय सडक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन देऊळगाव गुजरी ते सावळदबारा या महत्त्वाच्या रस्त्याच्या सिमेंटीकरणासाठी मंजुरी देण्याबाबत चर्चा करण्यात आली. या रस्त्यामुळे अनेक गावांचा संपर्क सुधारून शेतकरी, विद्यार्थी व व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या बैठकीस कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल व स्वराज डापके उपस्थित होते.
त्यानंतर केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री किरण रिजिजू यांची भेट घेऊन सिल्लोड-सोयगाव तालुक्यातील विविध विकासकामांसाठी निधी, अल्पसंख्यांक युवकांना रोजगाराच्या संधी, महिला बचत गटांना आर्थिक सहाय्य आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. संबंधित मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत कार्यवाहीचे आश्वासन देण्यात आले.
याशिवाय दुर्गम भागातील मोबाईल नेटवर्क समस्येच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची भेट घेऊन मोलखेडा, महालब्दा, टिटवी, चारूतांडा, मूर्ती, रवळा, ढाबा तसेच अजिंठा परिसरात मोबाईल टॉवर उभारण्याची मागणी करण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण, शेतकऱ्यांची माहिती व आपत्कालीन सेवा अधिक सक्षम होणार आहेत.
दरम्यान, फर्दापूर गटातील जनतेने दिलेला विजय हा केवळ निवडणुकीचा निकाल नसून विकासाच्या राजकारणाचा विजय असल्याची भावना व्यक्त होत आहे. रस्ते, पाणी, शिक्षण, मोबाईल नेटवर्क, महिला सक्षमीकरण, रोजगार व पर्यटन विकास अशा विविध क्षेत्रात आगामी काळात मोठ्या प्रमाणात कामे होणार असल्याची अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
सोयगाव तालुक्याच्या इतिहासात प्रथमच केंद्रस्तरावर इतक्या मोठ्या प्रमाणात पाठपुरावा होत असल्याने नागरिकांमध्ये आशावादाचे वातावरण निर्माण झाले आहे. जनतेचा विश्वास कायम राखत तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी इद्रिस मुलतानी सातत्याने प्रयत्नशील असल्याचे चित्र दिसून येत आहे.






