छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी : गोकुळसिंग राजपूत
सोयगाव तालुक्यातील फर्दापूर येथे भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) वतीने जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन मोठ्या उत्साहात व जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न झाले. फर्दापूर तसेच सावळदबारा परिसरातील नागरिकांच्या समस्या तत्परतेने सोडविणे, शासनाच्या विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे आणि पक्ष व जनतेमधील दुवा अधिक मजबूत करणे या उद्देशाने या कार्यालयाची स्थापना करण्यात आली आहे.
दि. २० फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित कार्यक्रमास भाजपाचे अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष इद्रिसजी मुलतानी यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन पार पडले. यावेळी माहिन इद्रिस मुलतानी, राहुल राठोड, उत्तम महारू चव्हाण यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात विधिवत पूजन करून करण्यात आली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फीत कापून कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी बोलताना इद्रिस मुलतानी यांनी सांगितले की, “हे जनसंपर्क कार्यालय केवळ पक्षाचे केंद्र नसून, सामान्य नागरिकांच्या अडचणी ऐकून त्यावर मार्ग काढणारे सेवा केंद्र असेल. शासनाच्या योजना, विविध प्रमाणपत्रे, शासकीय कार्यालयीन कामे, सामाजिक प्रश्न यासाठी नागरिकांना योग्य मार्गदर्शन मिळावे हा आमचा प्रयत्न राहील. उद्यापासून आपण सर्वांच्या सेवेसाठी कटिबद्ध आहोत. मायबाप जनतेचा आशीर्वाद आमच्यावर कायम राहू द्या.”
पुढे त्यांनी असेही नमूद केले की, पक्षाच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील. युवक, महिला, शेतकरी व अल्पसंख्याक बांधवांसाठी विशेष उपक्रम राबविण्याचा मानसही यावेळी व्यक्त करण्यात आला.
उपस्थित मान्यवरांनीही आपल्या मनोगतातून नव्या कार्यालयामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे सांगितले. जनसंपर्क कार्यालयामुळे शासकीय योजनांची माहिती थेट नागरिकांपर्यंत पोहोचणार असून, विविध प्रश्नांसाठी स्थानिक पातळीवरच मदत उपलब्ध होणार आहे.
कार्यक्रमास स्थानिक ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. उद्घाटनानंतर सर्व उपस्थितांचे आभार मानण्यात आले.
भाजपा जनसंपर्क कार्यालय, फर्दापूर आता नागरिकांच्या सेवेसाठी नियमितपणे सुरू राहणार असून, परिसरातील विकासासाठी ते महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.अशी माहिती प्रा जीवन कोलते पाटील सामाजिक कार्यकर्ते यांनी बोलताना सांगितले






