प्रतिनिधी गोकुळ सिंग राजपूत
पहूर, ता. जामनेर : येथील प्रज्ञाशील बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने भारत रत्न बहुउद्देशीय सभागृहात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी श्रद्धापूर्वक साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मा. अनिल रामराव पाटील सर यांच्या हस्ते राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष विलास भालेराव सर यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्यावर सविस्तर मार्गदर्शन केले.
अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या कर्तृत्व, दूरदृष्टी आणि लोककल्याणकारी कार्यातून आदर्श राज्यकारभाराचा वस्तुपाठ निर्माण केला. त्यांनी देशभरात मंदिरे, धर्मशाळा, पाणवठे, विहिरी, पायविहिरी आदी बांधून जनतेच्या सोयीसाठी महत्त्वपूर्ण कार्य केले. न्यायप्रिय, प्रजाहितदक्ष आणि कर्तृत्ववान राज्यकर्त्या म्हणून त्यांचे कार्य आजही समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
अहिल्यादेवी होळकर यांनी प्रतिकूल परिस्थितीतही धैर्याने राज्यकारभार सांभाळत लोककल्याणाला सर्वोच्च प्राधान्य दिले. त्यांच्या कार्यातून समाजसेवा, महिला सक्षमीकरण, न्यायनिष्ठा आणि राष्ट्रप्रेमाची प्रेरणा मिळते, असेही यावेळी नमूद करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सचिव दिनकर सुरडकर यांनी केले, तर आगारे सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
यावेळी गणेश तायडे, राजेश मोरे, प्रमोद सुरवाडे, अण्णा निकम, अनिल पाटील सर, किशोर बाविस्कर, युवराज मोरे दादा, नितीन बनसोडे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण व भावपूर्ण वातावरणात पार पडला.






