जळगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
तिरंगा हातात घेत शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग; देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमला
जळगाव : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाच्या ‘हर घर तिरंगा’ अभियानाला व्यापक स्वरूप देण्यासाठी स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. उपप्राचार्य प्रा. राजश्री महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेली ही रॅली उत्साहपूर्ण व देशभक्तीमय वातावरणात पार पडली.
या बाईक रॅलीमध्ये महाविद्यालयातील प्रा रणजीत पाटील,शिक्षक बंधू-भगिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. शिक्षकांनी हातात तिरंगा ध्वज घेऊन बाईकवरून रॅलीमध्ये सहभाग घेतला. यावेळी देशभक्तीपर घोषणा देत परिसरात राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करण्यात आली. तिरंग्याचा सन्मान, राष्ट्रध्वजाबद्दल आदर आणि देशाच्या स्वातंत्र्याच्या अमूल्य इतिहासाची जाणीव विद्यार्थ्यांसह नागरिकांमध्ये निर्माण करण्याचा संदेश या रॅलीच्या माध्यमातून देण्यात आला.
‘हर घर तिरंगा’ हे केवळ अभियान न राहता प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये राष्ट्रध्वजाविषयी अभिमान आणि देशभक्तीची भावना दृढ व्हावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने प्रत्येक घरावर तिरंगा फडकविण्यासोबतच प्रत्येक भारतीयाच्या मनातही राष्ट्रप्रेमाचा तिरंगा सदैव फडकत राहावा, असा प्रेरणादायी संदेश रॅलीतून देण्यात आला.
रॅलीदरम्यान ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’, ‘जय हिंद’ अशा देशभक्तीपर घोषणांनी वातावरण भारावून गेले. शिक्षकांच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्येही राष्ट्रध्वजाविषयी आदर, राष्ट्रीय एकात्मता आणि देशप्रेमाची भावना अधिक दृढ होण्यास मदत झाली.
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयाने आयोजित केलेल्या या उपक्रमाचे नागरिकांकडूनही कौतुक करण्यात आले. विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच राष्ट्रभक्ती, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रीय मूल्यांची जाणीव करून देण्यासाठी महाविद्यालयाच्या वतीने विविध उपक्रम राबविले जात असल्याचे यावेळी दिसून आले.
रॅलीच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य रणजीत पाटील, उपप्राचार्य प्रा. राजश्री महाजन, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच संबंधितांनी सहकार्य केले. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या बाईक रॅलीने स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवाला देशभक्तीची नवी उंची मिळवून दिली.






