चिंचपूर प्रतिनिधी (ता. खामगाव):विलास गवरगुर
चिंचपूर शिवारात अज्ञात चोरट्यांनी झटका मशीन चोरी केल्याच्या घटनांमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे जंगली प्राण्यांपासून संरक्षण व्हावे यासाठी शेतात झटका मशीन बसविल्या होत्या. मात्र काल रात्री चोरट्यांनी या मशीनवर डल्ला मारला.
यामध्ये बबन गवारगुर, योगेश इंगोले व साहेबराव गवारगुर या कष्टकरी शेतकऱ्यांच्या शेतातील एकूण तीन झटका मशीन अज्ञात चोरट्यांनी पळविल्या. आधीच नैसर्गिक आपत्ती, जंगली प्राण्यांचा त्रास आणि वाढता खर्च यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांवर आता चोरीचे संकट ओढावले आहे.
या घटनेमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, अशा वारंवार घडणाऱ्या चोरीच्या घटनांवर प्रशासनाने तात्काळ कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकरी बांधवांकडून होत आहे.
तसेच रात्रीच्या वेळी शिवारात पोलीस गस्त वाढवावी व चोरट्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी केली आहे.






